Maitri Kashi Asavi In Marathi – निसर्गामध्ये काही गोष्टी अशा असतात की, त्या नेमक्या कशा आहेत किंवा कशा असाव्यात हे सांगायचे म्हटले तर ते आपल्याला सांगता येत नाही. एखाद्याने आपल्याला प्राणवायू अर्थात ऑक्सीजन कसा आहे? हे विचारले तर आपण तो नेमका कसा आहे? हे सांगू शकत नाही परंतु त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही हे मात्र नक्की.
जर आपण काही सेकंद प्राणवायू घेणे बंद केले, तर आपण जगू शकणार नाही. अगदी मैत्रीच्या बाबतीत देखील तसेच आहे. मैत्री नेमकी कशी असते किंवा असावी, हे सांगायचे म्हटले तर आपण सांगू शकत नाही, कारण मैत्री ही अनुभवायची गोष्ट आहे.
आजच्या लेखाच्या माध्यमातून मैत्री कशी असावी (Maitri Kashi Asavi In Marathi) याविषयी मी आपल्याशी मनसोक्त बोलणार आहे.
मैत्री कशी असावी लेख मराठी (Maitri Kashi Asavi In Marathi)

मैत्री अशी असावी की, त्या दोन मित्रांचे किंवा मैत्रिणींचे केवळ विचार जुळणारे असावेत असे नाही तर त्या दोघांना किंवा त्या दोघींना पडणारी स्वप्न देखील अगदी सारखीच असावी. याचाच अर्थ जर दोन व्यक्तिमत्त्वांचे विचार, आचार जगण्याची पद्धत, सवयी, स्वभाव सारखेच असतील तर त्या दोघांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण होत असते.
थोडक्यात मैत्री ही एकमेकांच्या हृदयाला हात घालणारी असावी. कोणत्याही बाबतीत निर्णय घ्यायचा असो, तो निर्णय घेत असताना दोघांमध्ये एकवाक्यता असावी.
सध्या जगातल्या प्रत्येकच नात्यांमध्ये आपल्याला स्वार्थ बघायला मिळतो, अगदी रक्ताच्या नात्यात देखील. आज आपण पाहतो की कोर्टामध्ये दाखल असलेल्या केसेस मध्ये भावाभावांमधील आणि बहिण भावांमधील संपत्तीवरून असणारे वाद सर्वात जास्त आहेत. परंतु याला आपली मैत्री ही अपवाद असावी.
मैत्रीमध्ये कोणत्याच प्रकारचा स्वार्थ नसतो. एका मित्राला कायम असे वाटायला हवे की माझा मित्र ज्यामध्ये आनंदी आहे. त्यामध्ये मी देखील आनंदी असणार आहे. तर दुसऱ्याला देखील असेच वाटायला हवे की मला थोडा त्रास झाला तरी चालेल परंतु माझा मित्र कायम आनंदी हवा.
त्याला कुठल्याही प्रकारच्या हाल अपेष्ठांचा सामना करावा लागू नये. थोडक्यात कळत नकळतपणे स्वतःपेक्षा मित्राची काळजी जास्त घेते ती मैत्री असते.
लहानपणीची मैत्री तर काही औरच असते. आपण व आपल्या मित्र मंडळीनी एखाद्या ठिकाणी काही चुकीचे काम केले असेल आणि त्या चुकीच्या कामामुळे आपल्या मित्राला मार बसणार असेल त्यावेळी त्याला बसणारा मार देखील आपण खोटे बोलून वाचवायचो.
कधी कधी तर स्वतः मार खातो परंतु आपल्या मित्राला त्यापासून वाचवतो. म्हणजेच काय तर संकट आल्यानंतर त्या संकटांमध्ये माझ्या मित्रावर येणारे संकट ते माझे संकट अशी भूमिका मैत्रीमध्ये असावी.
चार लोकांमध्ये गेल्यावर कसे बोलावे, इतरांसमोर कसे वागावे? कसे उठावे, कसे बसावे, काय खावे, काय खाऊ नये, दुसऱ्याशी बोलताना आवाज किती असावा? एखाद्याच्या शेजारी उभे राहिल्यानंतर कसे उभे राहावे, गप्पा मारताना आवाजाचा चढउतार किती असावा अशा ज्या चौकटी आपण समूहामध्ये अर्थात समाजात वावरत असताना आपल्याला पाळाव्या लागतात, परंतु मैत्री अशी असते की त्या मैत्रीमध्ये अशा कोणत्या चौकटी नसतात.
यामुळे तर मित्र एकमेकांच्या समोर आल्यानंतर एकमेकांच्या खांद्यावर थाप मारतात ,जोरजोरात ओरडतात किंकळतात , कारण अशी कोणतीच बंधने मैत्रीला मान्य नसतात. म्हणूनच मैत्री ही औपचारिक चौकटीत बसणारी नसावी ती अगदी बिनधास्त मनमुराद आनंदी आनंद देणारी असावी.
मैत्री कशी असावी कविता (Maitri Kashi Asavi In Marathi)

मैत्री असावी घनिष्ठ,
त्यामध्ये भेद नसावा,
श्रेष्ठ आणि कनिष्ठ..
मैत्री असावी
झुळझुळणाऱ्या झर्यासारखी,
मैत्री असावी
मुरलेल्या लोणच्यासारखी…
तितकीच आंबट
तितकीच गोड
असावी एकमेकांची ओढ
कधी काढावी
एकमेकांची खोड
जगताना कशाचा न घ्यावा लोड
हातात असेल जरी
पेरूची एक फोड
पण दोघे खातील आवडीने गोड, थोडक्यात मैत्री ही निरपेक्ष असावी.
Maitri Kashi Asavi In Marathi

मैत्रीमध्ये मान, अहंकार यासारख्या बाबींना थारा नसावा. मैत्री मैत्री सारखीच असावी. मी श्रेष्ठ, तू कनिष्ठ. मी श्रीमंत, तू गरीब. मी हुशार, तू मंद अशा बाबी मैत्रीमध्ये असू नये.
या बाबी मैत्रीमध्ये यायला लागल्या की समजून जावे की, मैत्रीचे नाते आता नावाला शिल्लक उरले आहे. कारण मैत्रीला कोणतेच भेदाभेद मान्य नसतात. अगदी जातीपातीच्या, रक्ताच्या नात्याच्या पलीकडे जाणारे नाते जर असेल तर ते असते मैत्रीचे.
काही कारणामुळे एखाद्या मित्राला शिक्षणासाठी, नोकरीसाठी आपले गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत असेल, त्यावेळी आपल्या आई वडिलांबरोबर आपल्या जिवलग मित्राच्याही डोळ्यात पाणी येतं असते. अशी ही मैत्री एकमेकांना स्नेहाने बांधून ठेवणारी असावी.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी धंद्याला लागल्यानंतर किंवा एकंदरीतच संसारामध्ये रमल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या वाढतात आणि या जबाबदाऱ्या वाढल्यानंतर आपण आपल्या मित्रांना तितकासा वेळ देऊ च असे होत नाही.
परंतु ठरवून का होईना महिन्यातून, सहा महिन्यातून जर ते मित्र एकमेकांसाठी एकत्र येत असतील. एकमेकांना वेळ देत असतील तर खरोखरच ती मैत्री ही एक आदर्श मैत्री असेल. कारण आज प्रत्येक जण पैशाच्या मागे धावत आहे.
पैसा म्हणजे सर्व काही या भूमिकेतून आजचा माणूस जगताना दिसत आहे. ज्यावेळी पैसा ही बाब मैत्रीमध्ये येईल त्यावेळी मैत्रीत देखील एक प्रकारची कृत्रिमता येण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणूनच मैत्री अशी असावी की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची कृत्रिमता नसेल ती एक प्रांजळता.
कधीही कोठेही भेटलो तर हातात असेल ते काम सोडून चटकन आपले पाय ज्यावेळी आपल्या मित्राकडे, मैत्रिणीकडे वळतील त्यावेळी समजून चालायचे की आपली मैत्री अजून टिकून आहे तितकीच ती ताजी तवानी आहे.
थोडक्यात या लेखाला विराम देता देता एकच सांगेन, जगाच्या बाजारात सगळ्या गोष्टींचे मोल ठरलेले आहे. परंतु एकच गोष्ट अनमोल आहे की जिचे मूल्य करता येत नाही, ती म्हणजे मैत्री. म्हणूनच आपली मैत्री ही कोणाशीही असो ती अनमोल असायला हवी.
जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर आपला मित्र संकटात असेल, त्याला आपली गरज असेल. त्यावेळी आपली मैत्री मित्राच्या संकट काळामध्ये आपल्या मित्राने साद न घालता आपसूकच प्रतिसाद देणारी असावी. अर्थात जीवनामध्ये चढउतार असतात परंतु त्या चढउतारांमध्ये एकमेकांना साथ देणारी मैत्री असावी.
मैत्री कधी हसवणारी असावी
– मैत्री चारोळी मराठी
तर मैत्री रडवणारी असावी
मैत्री जीवाला जीव
लावणारी असावी
तर संकट समयी
मित्रासाठी धावणारी असावी
अशी असावी मैत्री…. किती लिहिलं तरी कागद संपावा पेनातील शाई संपावी परंतु मैत्रीचे गुणगानं न संपावे अशी असावी मैत्री.
मैत्री असावी तुमच्या माझ्या सारखी, एकमेकांचा कमी सहवास लाभून, विश्वासाचा पुल उभी करणारी. जीवनात खूप कायतरी करायचे आहे, पण त्यात माझा मित्र माझ्यासोबत असेल अशी भूमिका असणारी..
सारांश
तर मित्रांनो, शेवटी इतकेच सांगेल की मैत्री ही निखळ, निस्वार्थ आणि मस्तीने भरलेली असावी. मैत्रीला कुण्या गोष्टीची तमा अन बंधन नसते. त्यामुळे तर नात्याच्या पलीकडचे अतूट बंधन मैत्रीचे असते. आशा करतो की मैत्री कशी असावी (Maitri Kashi Asavi In Marathi) हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल.
तुम्हाला आवडतील असे विशेष लेख –